चंद्रपूर, दि. १३ [प्रतिनिधी] :- चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- २०२५’ च्या माध्यमाने चंद्रपूरमधून ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधातील शंखनाद केला जाईल. ग्लोबल वॉर्मिंगच्या चिंतेने ग्रासलेल्या जगाला क्लायमेट चेंजच्या संदर्भात धोरण तयार करण्यात चंद्रपूर मोठे योगदान देईल, असा विश्वास राज्याचे मा. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आढावा बैठकीतून व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत मुनगंटीवार यांनी ग्लोबल वॉर्मिंग आंतरराष्ट्रीय परिषदेच्या तयारीचा आढावा घेतला. प्राप्त माहितीनुसार या परिषदे मध्ये १७० हून अधिक संशोधन अहवालाचे सादरीकरण, जागतिक हवामान तज्ज्ञांचे मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, युवा नेतृत्वाला प्रोत्साहन, आदी उपक्रम होणार आहेत. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळावे, यासाठी मुनगंटीवार प्रयत्नरत असल्याचे कळते. यादृष्टीने वीस कलमी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आयोजित आजच्या आढावा बैठकीला एसएनडी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव (आभासी पद्धतीने), प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक डॉ. राजेश इंगोले व अन्य अधिकारी उपस्थित होते.
दि. १६ जानेवारी गुरुवार रोजी दुपारी ३.०० वाजता राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन होणार आहे. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील वातावरण बदलावर चिंतन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ‘पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात तात्कालिक नव्हे तर स्थायी स्वरुपाचे कार्य आवश्यक आहे. केवळ चंद्रपूरच्या नव्हे तर संपूर्ण राज्याच्या, देशाच्या वातावरणात होणारे बदल, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण संवर्धन या संदर्भात राज्यामध्ये स्थायी समिती तयार करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती ही यावेळी मुनगंटीवार यांनी दिली.
या परिषदेचे नियोजन मी वनमंत्री असतानाच झाले होते. त्याचे उद्घाटन येत्या १६ जानेवारीला होत आहे. यामध्ये महामहीम राज्यपालांसह जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांच्यासारखे पर्यावरण तज्ञही सहभागी होणार आहेत. अमेरिकेसह बाहेरील देशातूनही पर्यावरण तज्ञांचा यामध्ये समावेश असणार आहे, अशी माहितीही आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. या बाबत पुढे बोलतांना मुनगंटीवार यांनी, पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांना जोडण्यासाठी एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले असून यामध्ये पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत गांभिर्य असलेल्या संस्था व व्यक्ती सहभागी होऊ शकतात, अशी माहिती दिली.
चंद्रपूरमधील वन अकादमी येथे या तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- २०२५’चे आयोजन दिनांक १६ ते १८ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई, सिटी युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क, अमेरिका यांचे शैक्षणिक सहकार्य लाभले असल्याचे कळते. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मँग्रोव्ह फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, इकोलॉजिकल सोसायटी, पुणे आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्या एकत्रित सहकार्याने सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कळते.